ROHIT PAWAR: “पत्त्यांच्या खेळात अडकलेले कृषीमंत्री; शिंदे सरकार बॅगवाल्यांवर कारवाई करणार का?”…पहा सविस्तर
ROHIT PAWAR: राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या चांगलेच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. अधिवेशनादरम्यान सभागृहात मोबाईलवर ऑनलाइन रमी खेळताना त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची लाट उठली आहे.
मुंबई | Mumbai
ROHIT PAWAR: राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या चांगलेच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. अधिवेशनादरम्यान सभागृहात मोबाईलवर ऑनलाइन रमी खेळताना त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची लाट उठली आहे. आधीच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले कोकाटे आता ‘रमी किंग’ म्हणून ओळखले जात असून, त्यांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यातच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (ROHIT PAWAR) यांनी ट्विट करत हल्लाबोल केला आहे.
“पत्ते खेळणाऱ्या कृषीमंत्र्यांचा राजीनामा अपेक्षित असून, अजितदादांनी घेतलेली कठोर भूमिका इतर मित्रपक्ष दाखवतील का?” असा सवाल करत त्यांनी (ROHIT PAWAR) थेट शिंदे गटावर निशाणा साधला आहे. “बॅगवाल्या मंत्र्यांवर कारवाई करायची हिंमत शिंदे साहेब कधी दाखवणार?” असा थेट सवाल करत त्यांनी सरकारमध्ये सुरू असलेल्या ‘दोन नियम, दोन न्याय’ संस्कृतीवर बोट ठेवलं आहे. आता या सगळ्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. कधी वादग्रस्त वक्तव्यांमुळे, तर कधी त्यांच्या वागणुकीमुळे ते चर्चेचा विषय ठरत आहेत. मात्र यावेळी त्यांनी सर्व सीमाच ओलांडल्या. विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान, सभागृहात बसून मोबाईलवर ऑनलाइन रमी खेळताना ते दिसले. सभागृहाचे कामकाज सुरू असताना कोकाटे रमी खेळत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
या कृत्यावर सर्वसामान्यांपासून विरोधकांपर्यंत संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे येत्या सोमवारी कोकाटेंबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (ROHIT PAWAR) यांचे ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे. रमी प्रकरणावरून त्यांनी अप्रत्यक्षपणे सरकारला घेरत नैतिकतेचा सवाल उपस्थित केला आहे. कोकाटेंवर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पत्ते खेळणाऱ्या कृषीमंत्र्यांचा राजीनामा होण्याची शक्यता:

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सरचिटणीस रोहित पवार यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधत सोशल मीडियावर एक तीव्र आणि रोखठोक पोस्ट एक्सवर शेअर केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “पत्ते खेळणाऱ्या कृषीमंत्र्यांचा राजीनामा होण्याची शक्यता आहे,” आणि त्याचवेळी “उपमुख्यमंत्री अजितदादा दाखवत असलेली ही कठोरता सरकारमधील इतर मित्रपक्ष दाखवतील का?” असा थेट सवाल उपस्थित केला आहे.
रोहित पवार यांनी एका मंत्र्याचा उल्लेख “बॅगवाल्या मंत्री” असा करत, त्यांच्यावरदेखील “नेतृत्वाला कारवाई करावीच लागेल” असा ठाम इशारा दिला आहे. इतकंच नव्हे तर, “बॅगवाल्या मंत्र्यांवर कारवाई करायची हिंमत शिंदे साहेब कधी दाखवणार?” असा थेट प्रश्न विचारत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हानच दिलं आहे. या एका पोस्टमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
कोकाटे सोमवारी अजित पवारांना भेटणार:

दरम्यान, कोकाटे यांचे खाते बदलले जाणार की त्यांना राजीनामा द्यायला सांगणार, यावरून सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. त्यांच्या भविष्यावर नजीकच्या काळात मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. “सोमवारी कोकाटे हे आपल्याला भेटणार आहेत. त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ,” असे स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी स्पष्ट केले. सध्या वादळ निर्माण करणाऱ्या प्रकरणात, कोकाटे हे सभागृहात लक्षवेधी सुरू असताना ऑनलाईन रमी खेळत बसल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते.
यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून, ते स्वतः अडचणीत आले आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही टीका सहन करावी लागत आहे. त्यात भर म्हणजे, कोकाटे यांनी “शेतकरी नाही, सरकार भिकारी” असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सुनावले. या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि कोकाटे यांची भेट आणि त्या भेटीतून होणारा निर्णय हे राज्याचे राजकारण ढवळून काढण्याची शक्यता आहे.
“कोकाटे मला सोमवारी भेटणार आहेत. आम्ही समोरासमोर चर्चा करणार आहोत. त्यानंतर मी पुढील निर्णय घेईन,” असे स्पष्ट शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या एका मागोमाग एक वादग्रस्त कृतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत आली आहे. यावर अजित पवार यांनी आपल्या ठराविक शैलीत उत्तर देताना “प्रत्येकाने भान ठेवून बोलले, वागले पाहिजे” असा सल्लाही दिला. ते पुढे म्हणाले, “यापूर्वीही कोकाटे यांनी वादग्रस्त विधान केले तेव्हा त्यांना समज दिली होती.” मात्र, यावेळी प्रसंग गंभीर असल्यामुळे, त्यावर अधिक स्पष्ट निर्णय घेण्याची वेळ आली आहे.

“इजा झाले, बिजा झाले, तिजाची वेळ येऊ देऊ नका,” असे सूचक व सडेतोड शब्दांत त्यांनी इशारा दिला. “जर त्यांच्यावरील आरोपांत तथ्य आढळले, तर तो आमच्या अखत्यारीतील निर्णय असेल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही मिळून याबद्दलचा निर्णय घेऊ.” असे सांगून त्यांनी हे स्पष्ट केले की हा निर्णय केवळ गोंधळ घालणाऱ्यांचा नाही, तर सरकारचा अधिकार आहे. “बाकी कोण काय बोलत आहे याला काहीही अर्थ नाही,” असे ठणकावून सांगत अजितदादांनी बाह्य टीकाकारांना गप्प केलं आहे. आता कोकाटेंची सोमवारी होणारी भेट आणि त्यावरून होणारा निर्णय याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
